स्वामींसमोर उभा होतो,
हताश मी हात जोडून
डोळ्यामध्ये पाणी होते,
मनातून गेलो पूर्ण मोडून
मी म्हणालो,
“स्वामी , काय करू कळत नाही”
“प्रश्नाच उत्तर मिळत नाही”
स्वामी म्हणाले .. “विश्वास ठेव”
“सगळेच रस्ते बंद आहेत
आशेचे दिवे मंद आहेत”
स्वामी म्हणाले .. “विश्वास ठेव”
“आज असं वास्तव आहे
जिथे आशेचा किरण नाही
उद्या काही छान असेल
असा आजचा क्षण नाही"
मी म्हणालो
"कशावर मी विश्वास ठेवावा
जगामध्ये विश्वास आहे
तुमच्याकडे काय पुरावा ? ”
शांतपणे हसत स्वामी म्हणाले
"पक्षी उडतो आकाशात,
आपले पंख पसरून
विश्वास असतो त्याचा,
खाली न पडण्यावर..
मातीमध्ये बी पेरतो,
रोज त्याला पाणी देत
विश्वास असतो तुझा
रोप जन्म घेण्यावर..
बाळ झोपते खुशीत,
आईच्या कुशीत,
विश्वास असतो त्याचा,
तिने सांभाळून घेण्यावर..
उद्याचे बेत बनवतो,
रात्री डोळे मिटतो
विश्वास असतो तेंव्हा
पुन्हा प्रकाश होण्यावर..
आज माझ्या दारी येऊन,
आपली सगळी दुखः घेऊन,
विश्वास आहे तुझा
मी हाक ऐकण्यावर..
असाच विश्वास जागव मनात,
परिस्थिती बदलते एका क्षणात
नकळत तुझ्यासमोर,
असा एक क्षण येईल,
ज्याची आशा सोडली होतीस,
ते स्वप्न खरं होईल..
म्हणून....
सगळे रस्ते बंद होतील
तेंव्हा हा फक्त‘विश्वास ठेव’
जिथे संपते मर्यादा तुझी,
तिथून साथ देतो मी..!!!
No comments:
Post a Comment